श्रीशंभुराज्यभिषेक
श्रीशंभुराज्याभिषेक घडामोडी शके १६०२ रौद्र संवत्सरे श्रावण शुद्ध पंचमी (नागपंचमी) म्हणजेच २० जुलै १६८० रोजी संभाजी महाराजांचे मंचकारोहण झाले आणि त्यांनी स्वतःला “राजा” झाल्याचे घोषित केले. यासंदर्भात डाग रजिस्टर मध्ये २४ ऑगस्ट १६८० ची नोंद आहे – “जुन-जुलै शिवाजीराजा मरून संभाजीला त्याचे सिंहासन मिळाले असावे असे सर्वत्र बोलले जाते. आपल्या बापाच्या तत्त्वांप्रमाणे संभाजी वागणारा आहे असे लोक म्हणतात.” संभाजी महाराजांचा कारभार रायगडावरुन सुरळीत सुरु झाला. त्यांनी आगळीक करणाऱ्या सर्व मंत्र्यांना माफ करुन पुन्हा त्यांच्या पदावर पुन्हा नियुक्त केले. मोरोपंत पिंगळेंच्या निधनानंतर त्यांच्या पुत्राला पेशवाई दिली गेली. श्रीशंभुराज्याभिषेक सोहळा थोरल्या महाराजांच्या मृत्युनंतरच्या अस्थिर वातावरणात झालेल्या मंचकरोहणात शंभुराजे व त्यांच्या सहकारी मंत्र्याधिकाऱ्यांना त्यातुन तितके समाधान व शास्त्रार्थाच्या दृष्टीने निर्दोषत्व वाटले नाही. त्यामुळे शंभुराजांवर विधियुक्त राज्याभिषेक करवुन राजसिंहासानाची प्रतिष्ठा राखावी असा विचार झाला. त्यानुसार शंभुराजांनी आपला राज्याभिषेक करण्याचा निर्णय घेतला.